श्री स्वामी समर्थ
आंध्र प्रदेशातील श्रीशैल्य पर्वतराजीत प्राचीन काळापासून प्रसिद्ध असलेल्या कर्दळीवनातील निबिड अरण्यात, एकांतस्थळी एक महात्मा काष्ठ समाधीत निमग्न होता. शरीरावर लता,वेली, झुडपे, वारूळही उगवू लागली. एकेदि…
श्री स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ
आंध्र प्रदेशातील श्रीशैल्य पर्वतराजीत प्राचीन काळापासून प्रसिद्ध असलेल्या कर्दळीवनातील निबिड अरण्यात, एकांतस्थळी एक महात्मा काष्ठ समाधीत निमग्न होता. शरीरावर लता,वेली, झुडपे, वारूळही उगवू लागली. एकेदिवशी एका लाकूडतोड्याने वारूळावरील वेलीवर लाकडे तोडताना घाव घातला. तो घाव वारूळ फोडून त्या समाधीस्त योग्याच्या
मांडीवर बसला. त्या पाठोपाठ मांडीतून रक्ताची चिळकांडी उडाली. लाकूडतोड्या भयभीत झाला. इतक्यात त्या योग्याची समाधी भंग पावली. ते देहभानावर आले.
लाकूडतोड्यास अभयदान दिले. तपस्या संपवून इथूनच श्री स्वामी समर्थ विश्व कल्याणासाठी तेथून बाहेर पडले. हेच ते चौथे दत्तावतारी सद्गुरू श्री स्वामी समर्थ होत. स्वामींचा जन्म कधी झाला, कोठे झाला, याची ना कुठे नोंद आढळते, ना स्वामींच्या
बोलण्यातून कधी त्याचा उलगडा झाला. म्हणूनच त्यांचा प्रगटदिन साजरा केला जातो.
श्रीशैल्य पर्वतराजीतून बाहेर पडून श्री स्वामी समर्थांनी कोणकोणत्या स्थानांना भेटी दिल्या, हे इतिहासाला ज्ञात नाही. परंतु स्वामींच्या कथनातून वेळोवेळी जी माहिती झाली त्यातून काही आडाखे बांधता येतात. ते सर्वप्रथम काशीक्षेत्री आले. त्यानंतर आसेतुहिमाचल विविध तीर्थक्षेत्रांतून त्यांनी भ्रमण केले. ज्ञात इतिहासाप्रमाणे श्री स्वामी समर्थ प्रथम सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढे येथे प्रकट झाले. त्यानंतर पंढरपूर, मोहोळ, सोलापूर असे करीत अक्कलकोटला आले. स्वामींनी अक्कलकोटला वडाच्या झाडाखाली दीर्घकाळ
वास्तव्य केले, म्हणून त्यांना वटवृक्ष स्वामी म्हणून संबोधले जाते. चैत्र वद्य 13, मंगळवार, बहुधान्यनाम संवत्सर शके 1800 इ.स 1878 यादिवशी सायंकाळी चारच्या सुमाराला श्री स्वामी महाराज निजानंदी विलीन झाले.
श्री स्वामींनी शिप्य श्री बाळप्पा महाराजांवर अनुग्रह केला. त्यांनी आपल्या चिन्मय पादुका व इतर प्रासादिक चिन्हे देऊन, अक्कलकोटला मठ स्थापन केले. बाळप्पांना मंत्रदीक्षा देऊन त्यांना त्रयोदशाक्षरी महामूलमंत्राचा उपदेश केला. स्वामीभक्तीचा प्रचार करण्याची आज्ञा दिली. बाळप्पा महाराजांनी स्वामींच्या आज्ञेनुसार अक्कलकोटला मठ बांधून दत्तात्रेय गुरुपीठाची स्थापना केली. गुरू दत्तात्रेयांच्या परंपरेतील भगवान अवधूत दत्तात्रेय, श्रीपाद श्रीवल्लभ, श्री नृसिंह सरस्वती (गाणगापूर) आणि श्री स्वामी समर्थ अशी श्रेष्ठ गुरुपरंपरा अवधूत पीठास लाभली आहे. महान गुरू परंपरेतील श्री स्वामी समर्थांच्या नंतरचे चौथे उत्तराधिकारी म्हणून अक्कलकोट रेल्वे स्टेशन रस्त्यावरील शिवपुरी आश्रमाचे सत्यधर्मप्रणेता परमसद्गुरू श्री गजानन महाराज 1938 मध्ये पीठारूढ झाले.
श्री स्वामींची शिकवण म्हणजे त्यांनी वेळोवेळी प्रत्यक्षात कथन केलेल्या सांकेतिक शब्दांचे तात्पर्य होय. आत्मसाक्षात्कार करून घेण्यास साधकाला एखाद्या सद्गुरूस शरण जाण्याची गरज आहे. अशा सद्गुरूंची भेट झाल्यावर साधकाने सद्गुरूंच्या स्वरूपाचे निरंतर चिंतन करावे. त्यांची आराधना करावी. त्यांच्या मुखातून निघणारे प्रत्येक अक्षर, हे मंत्रस्वरूप मानून अंत:करणाने ग्रहण करावे. अशी गुरुसेवा केल्याने साक्षात्कार होऊन अंती मोक्षप्राप्ती होते. वाटेल त्याच्या हातचे अन्न ग्रहण करू नये. निरंतर केवळ विषय चिंतन करणा-या स्त्री अगर पुरुषाच्या हातचा विडाही खाल तर तुम्हीही तसेच व्हाल. दुष्ट मनुष्याच्या हातचे अन्न खाल तर, तुम्हीही दुष्ट व्हाल. एक ईश्वरच सर्वत्र भरलेला आहे अशी भावना करा, जेणेकरून तुमचे मन निरंतर पवित्र राहील. परावलंबी नसावे, स्वत: उद्योग करावा व खावे. गांजा केव्हाही ओढू नये, त्याने अपाय होतो. आपल्या धर्माप्रमाणेच (कर्तव्यकर्मानुसार) वागावे, त्यानेच सर्वत्र विजय प्राप्त होतो. ज्याप्रमाणे बी पेरल्याशिवाय शेत आपण होऊन पीक देत नाही, त्याचप्रमाणे तुम्ही स्वत: कोणतीही ज्ञानपिपासा दाखविल्याशिवाय गुरू आपण होऊन ज्ञानोपदेश देणार नाहीत. साधना करताना ज्या काही सिध्दी प्राप्त होतात, त्यांचा चमत्कार दाखविण्याच्या कामी उपयोग करणे गैर आहे. परमार्थज्ञानाचा उपयोग स्वचरितार्थाचे साधन म्हणून करणे हे अयोग्य आहे.
ईश्वरीय ज्ञानाचा उपदेश करणा-या सर्व धर्म मतांचे व सर्व पंथांचे अंतिम ध्येय एकच असल्यामुळे सर्व धर्म मते व पंथ वंदनीय आहेत. या जगात प्राप्त होणारी सुख-दु:खे, परमात्माच्या इच्छेने घडतात असे मानून त्यांचा स्वीकार करावा. मूर्तिपूजा ही त्याविषयी रहस्य जाणून करावी, केवळ मूर्तिपूजाच करीत राहणे, हेच मनुष्यप्राण्याचे कर्तव्य नाही. परमात्मप्राप्ती हे खरे ध्येय असल्याने उत्तरोत्तर आत्मोन्नती करून घेण्यासाठी प्रयत्नशील असावे.
